छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना दरमहा मोफत गहू आणि तांदूळ पुरविण्यात येते. मात्र या महिन्यात धान्य वाटपात बदल करण्यात आला असून गहू आणि तांदळासोबत ज्वारीचाही पुरवठा रेशन दुकानांवर सुरू करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार प्रति लाभार्थी १ किलो गहू, १ किलो ज्वारी आणि ३ किलो तांदूळ असा कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ३८ हजार लाभार्थी आणि १८०२ स्वस्त धान्य दुकाने आहेत. सध्या शहरातील १९९ तर ग्रामीण भागातील १६०० दुकानांवर गहू आणि ज्वारीचा पुरवठा पूर्ण झाला आहे. तांदळाचा पुरवठा सुरू असला तरी केवळ पन्नास टक्के दुकानांवरच तांदळाचा साठा पोहोचल्याने उर्वरित दुकानांवर वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांना माल देताना अडचणींचा सामना करावा लागत असून वाटपास विलंब होत आहे.
अन्नधान्य साठ्याची उपलब्धता तपासून कोणते धान्य कधी देायचे, याचा निर्णय शासनाकडून घेतला जातो. त्यानुसार यंदा ज्वारी वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मार्जीन मनीचा प्रश्न सुटणार
धान्य वितरणासाठी रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १७० रुपये प्रमाणे मार्जीन मनी दिला जातो. ऑक्टोबर महिन्याचा मार्जीन मनीचा निधी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाला असून लवकरच दुकानदारांना वितरित केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
तांदूळ पुरवठा वेगाने झाल्यास लाभार्थ्यांना सर्व धान्य वेळेत मिळेल, असा विश्वास पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*