छत्रपती संभाजीनगर : साताऱ्यातील प्रसिद्ध खंडोबा मंदिरात यात्रेनिमित्त रविवारी मोठी गर्दी झाली असताना महिला चोरट्यांच्या टोळीने भाविकांना लक्ष्य करत मोठा आर्थिक तोटा केला. दुपारी फक्त तीन तासांच्या कालावधीत तब्बल आठ महिलांच्या मंगळसूत्रांसह मुलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्यात आले. या घटनांमुळे यात्रेतील भाविकांमध्ये मोठी दहशत आणि अस्वस्थता निर्माण झाली.
३० नोव्हेंबरच्या सुट्टीमुळे सकाळपासून यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. चार दिवसांपूर्वीही सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सातारा पोलिसांनी रविवारी सकाळपासून विशेष बंदोबस्त ठेवून चोरांना पकडण्याची तयारी केली होती. मात्र, महिला चोरांच्या टोळीने पोलिसांच्याही नजरा चुकवत सहजपणे या चोरीच्या घटना घडवल्या.
दुपारी दोन ते पाच या वेळेत सलग ८ महिलांची तसेच काही लहान मुलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरीला गेल्याचे उघड झाले. अचानक चोरीच्या घटना समोर आल्यानंतर महिलांमध्ये मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर सातारा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सीमा काळे आणि कविता काळे या सासू-सुनेला पकडण्यात यश मिळवले. दोघीही मुकुंदवाडी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
मात्र, त्यांना पकडण्यापूर्वीच त्यांनी चोरलेले दागिने त्यांच्या साथीदारांनी घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अंदाजे ४ ते ५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्गा शर्मा यांच्या तक्रारीवरून आठ ते नऊ महिलांच्या दागिने चोरीप्रकरणी एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमा काळे ही नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने तिच्या आरोग्याचा विचार करून तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. कविता काळे हिला यापूर्वीही याच यात्रेत संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*