छत्रपती संभाजीनगर : जटवाडा रस्त्यालगतच्या ओव्हरगाव परिसरात शेतजमिनीच्या ताब्यावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादातून माजी सरपंच दादा साहू पठाण यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. स्थानिक ११ जणांच्या गुंडांच्या टोळीने दादा पठाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला चढवला. या हल्ल्यात दादा पठाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पठाण कुटुंबाचे मूळ ओव्हरगावचे असून, घरापासून काही अंतरावर शाळेजवळ त्यांची शेतजमीन आहे. या जमिनीला लागून असलेल्या छोट्या वाटेवरून सुरुवातीला किरकोळ वाद सुरू झाला होता. मात्र कालांतराने आरोपींनी संपूर्ण जमिनीवरच हक्क सांगण्यास सुरुवात केली. या कारणावरून यापूर्वीही अनेकदा तणाव निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी दादा पठाण यांनी जमीन सपाट करण्यासाठी जेसीबी मशीन बोलावले. याच वेळी १० ते ११ जणांची टोळी घटनास्थळी आली आणि वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.
हल्ल्याच्या वेळी पठाण कुटुंबातील महिलांनी हात जोडून आरोपींना थांबवण्याची विनंती केली. वाद मिटवण्याचे आर्जव केले. मात्र संतापलेल्या टोळीने लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड व लाथाबुक्यांनी सपासप वार केले. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रात्रीपर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतले असून उर्वरित दहा आरोपी फरार आहेत. घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*