maharashtra-board-exams-copy-free-campaign
छत्रपती संभाजीनगर : राज्य मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जिल्ह्यातील परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेऊन कठोर निर्देश दिले आहेत.
या परीक्षांसाठी बारावीचे ६३,२१८ तर दहावीचे ६७,९७८ विद्यार्थी बसणार आहेत. बारावीच्या परीक्षांसाठी १६१ आणि दहावीच्या परीक्षांसाठी २३८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना:
- सर्व परीक्षा केंद्रांची प्राथमिक तपासणी अधिकारी वेळेत करतील.
- परीक्षा केंद्रे भौतिक सुविधांनी सुसज्ज असावीत.
- परीक्षेच्या कालावधीत झेरॉक्स सेंटर बंद राहणार.
- संवेदनशील केंद्रांवर विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार.
- तालुका प्रशासन विविध विभागातील अधिकाऱ्यांची पथके तयार करून परीक्षा केंद्रांना भेटी देतील.
- कोणत्याही केंद्रात कॉपी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
- परीक्षा केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल; रिपोर्टिंग व तातडीची कारवाई केली जाईल.
- वैयक्तिक आणि सामूहिक कॉपीला पूर्णत: बंदी; उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होणार.
- कॉपीप्रकरणी दोषी शाळांची मंडळ व शाळा मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल.
- परीक्षा नियंत्रण कक्ष आणि वॉररूमद्वारे प्रत्येक केंद्रावर थेट नियंत्रण ठेवले जाणार.
जिल्हा प्रशासनाच्या या कठोर निर्णयांमुळे परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*