कन्नड : तालुक्यातील अंबाळा-ठाकूरवाडी येथे शुक्रवारी (२६ एप्रिल) पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर विषबाधेची घटना घडली आहे. ३२ ठाकरवाड्यांमधून आलेल्या सुमारे ६०० वन्हाड्यांना जेवणातून विषबाधा झाली. या दुर्घटनेत एका बालकाचा मृत्यू झाला असून, १७ जणांची प्रकृती गंभीर आहे.
सुरेश गुलाब मधे (वय ७, रा. महादेव खोरा) या बालकाचा करंजखेड येथील आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर रुग्णांवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, उर्वरित रुग्णांवर करंजखेड व नागापूर येथील आरोग्य केंद्रांमध्ये तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम:
अंबाळा येथे आदिवासी ठाकर समाजातील आठ वधूंचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी अंबाळा, कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, खोलापूर, धामडोह तसेच निरगुडी पिंपरी (ता. खुलताबाद), नांदगाव (जि. नाशिक) व चाळीसगाव (जि. जळगाव) येथून वन्हाड्यांचे आगमन झाले होते.
सायंकाळी ४.३० वाजता लग्नसोहळा संपल्यानंतर सर्व वन्हाड्यांनी भात, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी आणि बुंदीचा आस्वाद घेतला. जेवणानंतर सर्वजण आपल्या गावी परतले. मात्र शनिवारी सकाळपासून वन्हाड्यांना उलटी, जुलाब आणि चक्कर यासारख्या लक्षणांची तीव्रता जाणवू लागली.
करंजखेड व नागापूर येथील आरोग्य केंद्रांमध्ये व खाजगी रुग्णालयांमध्ये एकूण १५५ रुग्ण दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर प्रकृतीच्या भागाबाई बुंधा मेंगाळ, गंगुबाई बुंधा मधे, रखमाबाई लक्ष्मण मथे, वनिता तुकाराम मेंगाळ, काळूबाई मनोज मेंगाळ, आदित्य तुकाराम मेगाळ, गायत्री गुलाब मधे, संदीप मधे यांच्यासह १७ जणांना घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
विषबाधेच्या घटनेनंतर आरोग्य विभाग व प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, अन्नाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. याबाबत अधिक तपशील लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*