छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकरचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. अमोलच्या बहिणीने हा एन्काऊंटर ‘सुपारी घेऊन केलेला खून’ असल्याचा आरोप केला आहे, तर वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
वडगाव कोल्हाटी परिसरात रात्री झालेल्या चकमकीत अमोल खोतकरचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी कारवाई करत एन्काऊंटर केले. मात्र, या गोळीबारामागे नियोजनबद्ध षड्यंत्र असल्याचा संशय खोतकरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
“हा सुपारीने केलेला खून आहे” – रोहिणी खोतकर
“राज्यघटनेनुसार न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. पोलिसांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास न ठेवता आमच्या भावाला ठार मारलं. हा एक सुपारी खून आहे,” असे भावनिक शब्दांत रोहिणी खोतकर यांनी माध्यमांसमोर मांडले.
“सीबीआय चौकशीची गरज” – बाबुराव खोतकर
“आम्ही केवळ न्याय मागतोय. मुलाच्या छातीवर इतक्या गोळ्या का लागल्या? याचं उत्तर हवं. आम्हाला सीबीआय चौकशी पाहिजे,” अशी मागणी मृत आरोपीचे वडील बाबुराव खोतकर यांनी केली.
दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यापूर्वीच पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आता या एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात राजकीय आणि सामाजिक हालचालींनाही वेग आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*