छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करतील.
गेल्या वर्षभरात कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत तब्बल ४४ दुकानांचे परवाने निलंबित केले, तर ३२ परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय बनावट माल विकणाऱ्या विरोधात ३ पोलिस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे यंदा फसवणूक कराल तर दुकान बंदच होईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत प्रत्येकी एक आणि एक जिल्हास्तरीय असे एकूण १० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके बाजारपेठेत गस्त घालून शेतकऱ्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेणार आहेत.
जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, “अनुदानित खतांच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांवर दुसऱ्या मालाची जबरदस्ती करू नये, असा स्पष्ट आदेश दुकानदारांना दिला आहे.” शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानदारांकडूनच बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करून पावती अनिवार्यपणे घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाशी तातडीने संपर्क साधावा, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*