छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज (१२ जून) छत्रपती संभाजीनगरातील महावीर चौकात तीव्र चक्काजाम आंदोलन केले. “क्या हुआ तेरा वादा?” या घोषणा देत, शिवसैनिकांनी चौकातील चारही रस्त्यांवर ठाण मांडले आणि एकतासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प केली.
या आंदोलनात ठाकरे गटाचे शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक आणि रणरागिणी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी “महायुती सरकार मुर्दाबाद”, “शेतकऱ्यांना खते मिळालीच पाहिजेत”, “लाडक्या बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे”, “कर्जमाफी झालीच पाहिजे” अशा जोरदार घोषणा दिल्या.
महायुती सरकारने निवडणूक प्रचारात जनतेला फसवून अनेक आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच ती पूर्णतः विसरून जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने ५ ते १२ जून दरम्यान “क्या हुआ तेरा वादा?” हे आंदोलन सुरू केले होते. आजच्या चक्काजाम आंदोलनाने त्या आंदोलनाची सांगता झाली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला मात्र मार्ग मोकळा करून देण्यात आला. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता आणि आंदोलन आक्रमक होताच पोलिसांनी अंबादास दानवे आणि काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
या आंदोलनामुळे महावीर चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. नगरनाका, जिल्हा न्यायालय, बाबा पेट्रोलपंप परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*