छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील चितेगाव परिसरात जुन्या वादातून खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सहा वर्षांपूर्वी लहान भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने निर्दोष सुटलेल्या प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या केली आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
मयताचे नाव शेख अकबर शेख महेमूद ऊर्फ मियाँभाई (रा. चितेगाव) असे आहे. आरोपी माजी सरपंच शेख वाहेद शेख याकुब यांचा लहान भाऊ शेख रऊफ याची २०१९ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने १ जानेवारी २०२५ रोजी शेख अकबर, त्यांचे वडील, भाऊ आणि काका यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते. मात्र, त्या वेळीच शेख वाहेद यांनी कोर्टबाहेर धमकी दिली होती की “तुमची सुटका झाली असली तरी मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेख अकबर यांचे अपहरण झाले होते. तपासात पुढे आले की, ही हत्या सूडभावनेतून पूर्वनियोजित पद्धतीने केली गेली आहे. आरोपींनी कट रचून अकबर यांना बोलावून घेतले आणि त्यानंतर अपहरण करत हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह फेकून दिला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली मिळाली आहे.
या घटनेमुळे चितेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जुन्या वैमनस्यातून अशा प्रकारे निर्दोष व्यक्तीची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिडकीन पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*