छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी वाळूज पंढरपूर येथे उसळली होती. दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास करत सुरक्षिततेला मोठे आव्हान निर्माण केले आहे. गर्दीचा फायदा घेत तब्बल ३१ महिलांचे दागिने चोरट्यांनी पळवून नेली असल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण पंढरपूर परिसरात जय्यत बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाही ही घटना घडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यात्रेसाठी मंदिर परिसरात आणि काही प्रमुख मार्गांवर स्वयंसेवक व अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र गर्दीच्या झोतात काही ठिकाणी हा बंदोबस्त पुरेसा न ठरल्याचे चित्र होते. त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी आपल्या हातसफाईने अनेक महिलांना लक्ष्य केलं.
ही घटना लक्षात येताच महिला भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. यात्रा काळात भक्तिरसात ओतप्रोत झालेल्या महिलांना अशा प्रकाराचा फटका बसल्याने अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. गर्दीत दागिने चोरीचे प्रमाण वाढू लागल्याने अशा मोठ्या यात्रांमध्ये भाविकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने हालचाल करत २५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात महिलांसह पुरुषांचाही समावेश असून, हे सर्व १४ ते ४० वयोगटातील असल्याचे समजते. अधिक तपास सुरू असून काही चोरी गेलेल्या वस्तूंचा माग काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*