सिरसगाव (ता. कन्नड) येथील माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय ४७) यांची निर्घृण हत्या पूर्व वैमनस्यातून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच तीन तरुणांनी ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी रविवारी (दि. १३ जुलै) ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य आरोपी आनंद अमर राजपूत असून, त्याच्यासोबत समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शहा (सर्व रा. सिरसगाव) या दोघांनीही हत्येत सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता राजाराम चुंगडे हे आपल्या शेतवस्तीवरील घरासमोर बसले असताना, दुचाकीवर ट्रिपलसीट येऊन कोयत्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपासात आनंद राजपूत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पाच तासांत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वर्षभरापूर्वी राजाराम यांनी गावात आनंदला सर्वांसमक्ष मारहाण केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी समीर आणि इरफानच्या मदतीने हा कट रचण्यात आला. विशेष म्हणजे, हल्ला करताना पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी इरफानने महिलेचा वेश परिधान केला होता.
या हत्येत वापरलेला कोयता पूर्वी कन्नड शहरात झालेल्या हल्ल्यातही वापरण्यात आला होता. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकाने रात्री श्रीरामपूर येथे छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*