छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेत आता मालमत्तांचे पंचनामे करूनच पुढील कारवाई होणार आहे. शहरातील विविध भागांत कोणतीही पूर्वकल्पना न देता व पडलेल्या मालमत्तांचे पंचनामे न करता सुरु असलेल्या मोहिमेबाबत एका प्रतिष्ठित दैनिकाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शनिवारी (१९ जुलै) सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या.
आयुक्तांनी सांगितले की, रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांचे पंचनामे करावेत, प्रमाणपत्र द्यावे आणि कारवाईपूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे. नियमानुसार बांधलेल्या मालमत्तांना मोबदला देण्याबाबत निर्णय घेताना टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स) देण्याचा पर्याय विचाराधीन आहे. जर मालकांना टीडीआर नको असेल, तर त्यांच्याकडून लिखित संमती घेऊन रोखीने मोबदला दिला जाईल. बांधकाम व्यावसायिकांना १.१ एफएसआय वापरल्यानंतर प्रीमियमऐवजी टीडीआर वापरावा लागणार आहे.
बैठकीत धार्मिक स्थळे वाचवण्याचा प्रयत्न करावा, नाइलाज असल्यास संबंधितांना स्वतः हलवण्यास सांगावे, अशी सूचना देण्यात आली. रस्ता अलाइनमेंट आराखड्यात बदल असल्यास प्रशासकांना त्यांच्या अधिकारात बदल करण्याची मुभा दिली आहे. मोहिमेदरम्यान बाधित होणाऱ्या घर, दुकान, किंवा जागांचे पंचनामे करून, आर्थिक दुर्बलांना वॉर्ड कार्यालयामार्फत मजूर परवाना देणे, तसेच बेघर होणाऱ्या कुटुंबांना पंतप्रधान घरकुल योजनेत प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले.
सुमारे १५० घरांसाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून मदतीसाठी प्रयत्न होणार आहेत. २०२० पूर्वी खरेदी केलेल्या प्लॉटची प्रथम गुंठेवारी आणि नंतर बांधकाम झाल्यास त्याची स्वतंत्र गुंठेवारी करण्याचा आदेशही देण्यात आला. यामुळे मोहिमेतील सर्व कारवाई कायदेशीर, पारदर्शक आणि सर्वांसाठी न्याय्य राहील, असा प्रशासनाचा दावा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*