छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, यात्राकाळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
यासाठी जिल्हा प्रशासनाने यात्रेच्या काळात विक्री होणारे साबुदाणा, भगर, राजगिरा, लाडू, चिवडा, बटाटा चिप्स, लोणची, सुकामेवा तसेच विविध उपवासाचे पदार्थ, प्रसाद, पाणी, हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांची नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. उत्पादन दिनांक, वापरण्याची मुदत, साहित्याची यादी आणि अन्न परवाना क्रमांक नमूद नसलेले किंवा बिनमुदतीचे व निकृष्ट पदार्थ आढळल्यास तात्काळ नमुने घेऊन दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी अन्न विक्रेत्यांना वैध परवाने घेणे, स्वच्छतेचे नियम पाळणे, तयार अन्न योग्य तापमानात साठवणे आणि प्लास्टिकऐवजी सुरक्षित पॅकिंगचा वापर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच अन्नछत्रालये व भंडारे चालवणाऱ्यांनी ताजे आणि सुरक्षित अन्नच भाविकांना वितरित करावे; सकाळपासून संध्याकाळपर्यंत साठवलेले किंवा खराब होणारे अन्न वाटप टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
यात्राकाळात स्थायी स्वरूपाचे नियंत्रण कक्ष उभारून अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकांकडून सतत तपासणी, जनजागृती आणि नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही खरेदी करताना पॅकिंग आणि मुदत तपासावी आणि शंका आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
शाळांमधील मध्यान्ह भोजन, फळे, दूध, बिस्किटे तसेच शाळा परिसरात विक्री होणारे चटपटीत पदार्थ, पॅकेज्ड फूड यांचीही नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील धोका टाळण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपवासाच्या नावाखाली भेसळयुक्त किंवा सडलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*