छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून खूनासाठी वापरलेला चाकू पोलिसांच्या श्वान पथकाने शोधून काढला.
खून झालेल्या तरुणाचे नाव दीपक दत्ता कांबळे (वय २२, रा. पैठण) असे असून आरोपीचे नाव रवींद्र सुभाष बोर्डे (वय ३२, रा. शेंद्रा) असे आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दीपकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कांबळे हा मजुरीसाठी शहरात आला होता व गेवराई तांड्यातील शिवकृपा कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होता. तो खांडेवाडी रोडवरील वाणी यांच्या खानावळीत जेवायला जात असे. याच खानावळीत त्याची ओळख आरोपी रवींद्रसोबत झाली होती. गुरुवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद इतका वाढला की रवींद्रने रागाच्या भरात छोट्या चाकूने दीपकच्या छातीत वार केला. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने फेकून दिलेला चाकू शोधण्यासाठी पोलिसांच्या श्वान पथकाची मदत घेण्यात आली आणि चाकू हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रवींद्र बोर्डे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी विवाहितेचा छळ आणि बँकेशी संबंधित गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी मयत दीपक कांबळे यांच्या नातलगाच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*