छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील एका नामांकित स्टील उद्योगाची नाशिक जिल्ह्यातील दुकानदारांकडून वसूल करून आणलेली तब्बल २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रोकड दुचाकीस्वार चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड फेकत आणि चाकूहल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता उस्मानपुरा परिसरातील न्यू श्रेयनगरात घडली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

फिर्यादी दिनेश राधेशाम साबू (४५, रा. मंगलधाम स्वरसंगम सोसायटी, न्यू श्रेयनगर) हे जालन्यातील एका प्रसिद्ध स्टील कंपनीत नोकरी करतात. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध दुकानदारांकडून २७ लाख ५ हजार ९१० रुपये वसूल करून आणले होते. ही रक्कम त्यांनी रात्री घरात ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते ही रोकड कंपनीत जमा करण्यासाठी जाणार होते. दरम्यान, सकाळी १० वाजता त्यांचा कारचालक गणेश ओंकारराव शिंदे (४८, रा. बदनापूर) घरासमोर आला. साबू यांनी त्याला रोकड असलेली पिशवी देत ती कारमध्ये ठेवण्यास सांगितले आणि स्वतः जेवणाचा डबा घेण्यासाठी घरात गेले.

तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या दोन लुटारूंनी शिंदे यांच्यावर चाकूहल्ला करत त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि रोकड असलेली पिशवी हिसकावून पसार झाले. शिंदे यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने साबू घराबाहेर आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि उस्मानपुरा ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसह शिंदे यांची विचारपूस केली. पोलिसांनी शहरातील बाहेर जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करून चोरांचा शोध सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,373 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क