नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून उपराजधानी नागपुरात सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक भूमिकेत दिसणार आहेत. पीककर्ज माफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदार नोंदणी, तसेच विविध घोषणांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. आगामी आठ दिवसांचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.
पहिल्याच दिवशी चार मोठे मोर्चे विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले असून, याशिवाय यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनांचे 15 धरणे आंदोलन सुरु झाले आहे. काही आंदोलनकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने सुरक्षेचा विषय अधिक गंभीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन सर्वेक्षण, तसेच पोलिसांच्या हेल्मेट कॅमेऱ्याद्वारे मोर्चेकऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून खास मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर Jaish-e-Mohammad कडून धोक्याचा इशारा मिळाल्याने नागपूर उपराजधानी हायअलर्टवर ठेवण्यात आली आहे. RSS मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांवर विशेष फोर्स तैनात आहे.
AI-आधारित मॉनिटरिंग, बॉम्बशोधक पथके, फोर्स वनच्या तुकड्या आणि SRPF च्या पाच तुकड्यांसह एकूण 10 हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी शहरात तैनात आहेत. अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*