छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा रणसंग्राम आजपासून सुरू झाला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पहिल्याच दिवशी मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे महानगर प्रमुख रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
राजू वैद्य यांनी सोमवारी (दि. २२ डिसेंबर) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे पत्र पाठवून महानगर प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली होती. राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यानंतर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. या पक्षप्रवेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. आतापर्यंत आठ माजी महापौरांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर बारा ते पंधरा माजी नगरसेवकांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश केला असून, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने पक्षांतर करत आहेत.
भाजप प्रवेशानंतर बोलताना राजू वैद्य म्हणाले की, मी कॉलेजच्या जीवनापासून हिंदुत्वाच्या विचारांसाठी काम करत आलो आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटात राहून हे काम करताना अनेक अडचणी येत होत्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्या अडचणी दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून आमदार अतुल सावे यांनी भाजपमध्ये येण्याचा आग्रह धरला होता आणि आज तो योग आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्ष जेव्हा जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडत पक्षवाढीसाठी आणि हिंदुत्वाच्या विचारांसाठी काम करणार असल्याचा निर्धार राजू वैद्य यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घडामोड शहराच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*