छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीभोवती गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून भाजपने दोन्ही पदांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे अविनाश गलांडे आणि जितेंद्र जैस्वाल यांनीच अर्ज खरेदी केल्याने निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिक ठरली. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर इतर कोणताही उमेदवार पुढे न आल्याने दोन्ही पदे बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे संभाव्य चुरशीच्या लढतीची शक्यता संपुष्टात आली.
दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेत दोन्ही शिवसेना गटांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने राजकीय समीकरणे एकतर्फी झाली. काही दिवसांपासून सदस्यांची फोडाफोड, आघाड्या आणि युतीच्या चर्चांमुळे वातावरण तापले होते. मात्र, अंतिम टप्प्यात भाजपने आपली रणनीती यशस्वीपणे राबवत विरोधकांना मागे टाकले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसून आले, तर बहिष्कारामुळे विरोधकांची ताकद कमी पडली. परिणामी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता प्रस्थापित झाली असून महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपने आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*