छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वीजबिलाचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपुरवठा योजनेवरील प्रचंड वीजखर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, यामुळे मनपाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सध्या शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते. दरमहा कोट्यवधी रुपयांचे वीजबिल मनपाला भरावे लागते. विशेषतः २४ तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या पंपिंग सिस्टीममुळे खर्च अधिक वाढतो. या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा वापर करून हा खर्च कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रस्तावित सोलार प्रकल्पातून दररोज सुमारे ३७०० हॉर्सपॉवर क्षमतेचे दोन पंप २४ तास चालू ठेवता येणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा वापरल्याने प्रदूषणातही घट होणार आहे.
मनपा आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासंदर्भातील अंतिम निर्णय पुढील दोन आठवड्यांत घेतला जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जागेची निवड प्रक्रिया सुरू असून, शासकीय किंवा मनपाच्या मालकीच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. जागा निश्चित झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया राबवून प्रकल्पाच्या कामाला गती दिली जाईल.
दरम्यान, शहरातील नागरिकांना भविष्यात अधिक नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, तसेच मनपाचा आर्थिक ताण कमी व्हावा, या दुहेरी उद्दिष्टांसाठी हा सोलार प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*