छत्रपती संभाजीनगर : शहरातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही उष्णतेत कोणतीही घट जाणवत नसल्याचे चित्र आहे. उलट, दमट हवामानामुळे उकाड्याची तीव्रता अधिक वाढल्याचे जाणवत आहे.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, एप्रिल महिन्याच्या मध्यापासून शहरातील कमाल तापमान सतत ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिले आहे. १७ एप्रिल रोजी ४१.६ अंश इतके तापमान नोंदवले गेले, तर १९ एप्रिलला ते ४१.२ अंशांवर होते. २० एप्रिल रोजी ४१.५ अंश, २१ एप्रिलला ४०.५ अंश, २२ एप्रिलला ४१.० अंश, २३ एप्रिलला ४१.२ अंश, २४ एप्रिलला ४१.६ अंश आणि २५ एप्रिल रोजी तब्बल ४१.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे एप्रिल महिन्यातील ही उष्णतेची लाट अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, किमान तापमानही २४ अंशांच्या आसपास स्थिर असल्यामुळे रात्रीदेखील उकाड्यापासून दिलासा मिळत नाही. मागील दोन दिवसांत शहर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी त्याचा तापमानावर फारसा परिणाम झालेला नाही. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मात्र, तापमानात मोठी घट होण्याची शक्यता कमी असल्याने नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

368 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क