छत्रपती संभाजीनगर : शहरात किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड बायपास परिसरातील शिवदत्त पेट्रोलपंपाजवळील अपोलो टायर दुकानासमोर १२ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तिघा आरोपींनी एका तरुणावर कोयता आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव उमेश कन्हैयालाल चव्हाण (रा. गुरुदत्तनगर, गारखेडा) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हे आपल्या मित्रांसह झाल्टा फाट्याजवळील त्रिमूर्ती हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी काही तरुणांसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटल्याचे वाटत असतानाच आरोपींनी उमेश आणि त्यांच्या मित्रांचा पाठलाग सुरू केला.
यानंतर बीड बायपासवर आरोपींनी उमेश यांच्या गाडीला कट मारून त्यांना अडवले. कट का मारला असा जाब विचारताच पुन्हा दोन्ही गटांमध्ये वाद झाला. काही क्षणांतच आरोपींनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत उमेश यांच्यावर कोयता व चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपींनी “बायपासवर पुन्हा दिसू नको” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी अवस्थेत उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी दर्शन अण्णासाहेब निहारकर याला अटक केली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*