suspicious-death-woman-railway-tracks-aurangabad
छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात असलेल्या शिवकृपा कॉलनीतील एक महिला गिरणीत दळण आणण्यासाठी गेली होती. मात्र, काही वेळानंतर तिचा मृतदेह शहानुर मिया दर्गा चौकाकडून उस्मानपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे रुळावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव वैशाली प्रदीप हरेर असे असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा रेल्वे अपघात आहे की खून, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना रेल्वे रुळावर मृतदेह असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान, मृतदेहाचे डोके फुटलेले दिसून आले आणि तोंडात कॅरीबॅगचा बोळा कोंबलेला असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे अधिक संशय निर्माण झाला आहे.
याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. महिलेचा मृत्यू अपघातामुळे झाला की ही हत्या आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. तसेच, महिलेच्या हालचाली आणि फोन रेकॉर्ड्सचीही तपासणी केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा लवकर उलगडा करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*