गजानन राऊत: प्रतिनिधी/ वाळूज : MIDC वाळूज पोलिस स्टेशन हद्दीतील टोकी गावातील शेतवस्तीवर राहणाऱ्या दोन शेतकरी कुटुंबांवर सोमवारी मध्यरात्री आठ ते दहा सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत तब्बल 5 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लुटला. लाकडी दांडे, कुऱ्हाडी आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुष, महिला आणि लहान मुलांना बेदम मारहाण केल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोकी शिवारात गट नंबर 9 मध्ये कारभारी बाबुराव शेजवळ (वय 45) आणि त्यांचे बंधू भीमराव शेजवळ आपल्या कुटुंबासह शेतीसाठी वास्तव्य करत होते. 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास आठ ते दहा अज्ञात दरोडेखोरांनी प्रथम कारभारी शेजवळ यांच्या घरावर हल्ला करत त्यांना, त्यांच्या पत्नी व मुलाला लाकडी दांड्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत 2 लाख 11 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लुटून नेली.
यानंतर दरोडेखोरांनी शेजारी राहणाऱ्या भीमराव शेजवळ यांच्या घरावरही हल्ला करून त्यांच्या पत्नी व मुलांना मारहाण केली. त्यांच्याकडून 3 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला गेला. ही घटना घडून गेल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये मानसिक धक्का आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत श्वानपथकाला पाचारण केले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत संशयित म्हणून पाच इसमांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी दिली आहे.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*