छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, दिव्यांगांचे मानधन वाढविणे यासह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे उद्या, गुरुवारी (दि. २४) जालना रोडवरील दूध डेअरी चौकात सकाळी ११ वाजता भव्य चक्काजाम आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू करणार असून, या आंदोलनात एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे सहभागी होणार आहेत. या संदर्भात माहिती शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे, ७/१२ कोरा करणे, विधवा माता, निराधार, मेंढपाळ यांचे मानधन वाढविणे यांसारख्या विविध आश्वासनांची घोषणा केली होती. मात्र या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने प्रहार संघटनेने सरकारविरोधात लढाईचा बिगुल वाजवला आहे. याआधी बच्चू कडू यांनी गुरूकुंज मोझरी येथे संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करून सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला होता.

दूध डेअरी चौकातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हे आंदोलन सुरू होणार आहे. या चक्काजाम आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा माता, दिव्यांग, मेंढपाळ यांच्यासह विविध समाजघटकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, शहराध्यक्ष कुणाल राऊत आणि दिव्यांग आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी गाडे यांनी केले आहे.

हे आंदोलन सरकारच्या भूमिकेविरोधात जनतेचा संताप व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरी, दिव्यांग व सर्वसामान्यांचे हक्क मिळवण्यासाठी प्रहार संघटनेच्या लढ्याचा भाग असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,160 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क