मुंबई : राज्यातील राजकारणात मोठा बदल करत फडणवीस सरकारने ३१ जुलै रोजी मंत्रिमंडळात महत्वाचा फेरबदल केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले असून त्यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. विधिमंडळ अधिवेशनात रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेचा भडिमार झाला होता. यामुळे सरकारची प्रतिमा धूमळली होती. विरोधकांनी कोकाटे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या कृषीमंत्रीपदाची जबाबदारी काढून ती दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवली आहे. भरणे हे इंदापूरचे आमदार असून याआधी त्यांच्या कडे क्रीडा खाते होते. आता त्यांच्याकडे कृषी खाते असेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय महायुती सरकारच्या कार्यक्षमतेचा आणि पारदर्शकतेचा विचार करून घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा असली तरी, सध्या केवळ कोकाटे यांच्या खात्यातच बदल करण्यात आला आहे. योगेश कदम, संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्यासह अन्य काही मंत्र्यांवरही विरोधकांकडून टीका सुरू आहे, परंतु त्यांच्या खात्यांबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*