राज्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना गावोगावी अचूक हवामान माहिती मिळणार असून मोबाईल अॅप, एसएमएस आणि ग्रामपंचायत स्तरावर सूचना देण्यात येतील.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग याबाबत योग्य माहिती मिळेल. त्यावर आधारित पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन आणि कापणीचे नियोजन करणे सोपे होणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींकडून आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
राज्यातील 25,522 ग्रामपंचायतींपैकी केवळ 13,463 म्हणजेच 53 टक्के ग्रामपंचायतींनी जागा निश्चित केली आहे. नाशिक विभाग सर्वात पुढे असून येथील 3,787 ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध केली आहे. संभाजीनगर विभागात 2,735 तर ठाणे विभागात केवळ 777 जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
कृषी विभागाने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून ऑगस्ट अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सप्टेंबरमध्ये जागा हस्तांतरण होऊन पुढील तीन महिन्यांत केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. मात्र वेळेत जागा मिळाली नाही, तर प्रकल्प उशिरा सुरू होईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सरकारी जागा उपलब्ध नसेल, तर ग्रामपंचायती खासगी जागा भाडेतत्त्वावर घेऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी ग्रामविकास विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान केंद्र उभारणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन शेती नियोजन अधिक शास्त्रशुद्ध होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*