छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरातील अहमदनगर कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी १० ते १५ फुटांचे खड्डे खोदण्यात आले होते. मात्र त्यांना संरक्षण जाळी न लावल्याने व पावसामुळे ते पाण्याने भरल्याने बुधवारी (दि.३) दुपारी ईश्वर संदीप भास्कर (रा. देवळाई, वय ३) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर घराबाहेर शेजारच्या लहानग्यासोबत खेळत असताना खेळता खेळता रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्यात पडला. बराच वेळ घरी न आल्याने त्याच्या आईने शोधाशोध केली. तेव्हा खड्यात पाण्यावर ईश्वर तरंगताना दिसला. दु:खाने व्याकुळ झालेल्या आईने स्वतः खड्ड्यात उडी मारून मुलाला बाहेर काढले. तातडीने घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून या भागात ठेकेदाराने मोठमोठे खड्डे खोदून ठेवले असून रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. पावसाळ्यात चिखल, घसरगुंडी व अपघाताचा धोका असल्याने खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी केली होती. मात्र याकडे ठेकेदार व प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी एका चिमुकल्याचा जीव गेला.

विशेष म्हणजे, ईश्वर ज्या खड्यात पडला त्यात पाईप टाकून जोडणी पूर्ण झाली होती. पण खड्डा बुजवण्याचे काम करण्यात आले नव्हते. केवळ थोडा मातीचा ढिगारा टाकला असता तरी ही दुर्घटना टळली असती, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या भागातील रहिवाशांनी संताप व्यक्त करून ठेकेदार व प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, नातेवाईकांनी घाटीत आक्रोश केला असून, आईच्या ओरडण्याने सर्वजण सुन्न झाले. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,111 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क