छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलींचे लग्न थांबवण्यासाठी पोलिस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भरोसा सेलच्या सतर्कतेमुळे सोमवारी गंगापूर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवण्यात आला. एका जागरूक नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइनवर दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एका निष्पाप मुलीचे बाल्य वाचले असून तिच्या शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे.

गंगापूर तालुक्यात सोमवारी सकाळी एका मंडपात लग्नाची लगबग सुरू होती. अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे लग्न एका मंडप व्यावसायिकाशी लावण्यात येत होते. पालकांनी चांगले स्थळ मिळाल्याने हा निर्णय घेतला होता. मात्र, माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे, अंमलदार कपिल बनकर, इर्शाद पठाण आणि भाग्यश्री चव्हाण यांनी तातडीने कारवाई केली.

पोलिस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंडपात जाऊन विवाह सोहळा थांबवला. त्यांनी पालकांना समजावत जोरदार आवाजात सांगितले की, “मुलगी अजून लहान आहे, तिचे शिक्षण थांबवू नका.” त्यानंतर पालकांना समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन देण्यात आले. शेवटी मुलीच्या पालकांनी लेखी हमीपत्र दिले की, मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि तिचे शिक्षण पूर्ण केले जाईल.

या तातडीच्या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे भविष्य वाचले असून बालविवाहासारख्या सामाजिक वाईट प्रथेला आळा बसला आहे. भरोसा सेलच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

838 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क