छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एम.जे.पी.) मार्फत हाती घेण्यात येत आहे. हे काम १२ ऑक्टोबरपासून सुरू होऊन ५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
कामाच्या कालावधीत हवामानानुसार परिस्थिती बदलू शकते. पाऊस झाल्यास सुरक्षा कारणास्तव भुयारी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार वाहतूक नियमनासंबंधी अधिसूचना जारी केली आहे.
पाऊस झाल्यास हे पर्यायी मार्ग वापरावेत:
देवळाई चौक येथून गोदावरी टीमार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून वाहने ये-जा करू शकतील. तसेच देवळाई चौक ते गोदावरी टी, एमआयटी, महानुभाव आश्रम चौकमार्गे रेल्वेस्टेशन रस्त्याचा वापर करता येईल. शिवाजीनगर आणि सूतगिरणी चौक येथून शहानूरमियाँ दर्गा चौकमार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून जाण्याची सुविधा असेल. याशिवाय गोदावरी टी, एमआयटी चौक आणि महूनगर टी पॉईंटमार्गे उस्मानपुरा भागाकडेही प्रवास करता येईल.
वाहनचालकांनी काम सुरू असताना नियमांचे पालन करावे, तसेच वाहतुकीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. पावसाळ्यात जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्याजवळ पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*