छत्रपती संभाजीनगर : नळाला पाणी आल्यानंतर घरातील विद्युत मोटार सुरू करताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी उस्मानपुरा परिसरातील त्रिशरणनगर भागात घडली. मृत महिलेचे नाव चित्रा संदीप गायकवाड (वय ४२) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही भागांमध्ये ४ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. शनिवारी उस्मानपुरा परिसरात पाण्याचा टप्पा होता. सकाळी पाणी आल्यानंतर चित्रा गायकवाड यांनी घरातील मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी मोटारच्या विद्युत जोडणीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक त्यांना जबर विजेचा शॉक बसला. यात त्या खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सरकारी घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चित्रा गायकवाड यांच्या पश्चात पती संदीप गायकवाड (रेल्वे कर्मचारी), एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून विद्युत सुरक्षा उपायांविषयी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*