छत्रपती संभाजीनगर : शहरातील जय भवानीनगर परिसरात एका २६ वर्षीय तरुणाने कर्जाच्या दडपणामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदेश दिनकर गवळी असे मृत तरुणाचे नाव असून, चोरीला गेलेल्या ट्रकचा शोध लागला नसल्याने आणि कर्जाचे हप्ते सुरूच राहिल्याने तो गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता.
संदेश गवळी हा टँकर व्यवसाय करत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी या उद्देशाने त्याने कर्ज काढून ट्रक खरेदी केला होता. मात्र काही दिवसांतच ट्रक चोरीला गेला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करूनही दीड वर्ष उलटून गेले तरी ट्रकचा तपास लागला नाही. यामुळे कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा वाढता बोजा त्याच्यावर वाढत गेला.
गुरुवारी सायंकाळी कुटुंबीय बाहेर गेले असताना संदेश घरी एकटाच होता. याच दरम्यान त्याने सविस्तर नोट लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. नोट लिहिल्यानंतर त्याने हसतमुखाने सेल्फी काढून तो मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि त्यानंतर विष प्राशन केले. कुटुंबीय घरी परतल्यावर त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुसाईड नोटमध्ये संदेशने कर्जाच्या ताणामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला या कर्जाचा कंटाळा आला आहे. मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. यासाठी दुसरे कोणीही जबाबदार नाही,” असे त्याने नमूद केले आहे. तसेच शेवटी त्याने आईची माफी मागत, “माझ्या आईची काळजी घ्या,” अशी भावनिक विनंती नातेवाईकांना केली आहे.
दरम्यान, नोटमध्ये पोलिसांच्या कामकाजाबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या ट्रकचा तपास लागला नसल्याने संदेशसारख्या तरुणांवर आर्थिक व मानसिक ताण वाढत असल्याचे चित्र या घटनेतून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*