छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून मराठवाडा विभागाचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात परभणी जिल्ह्याने सर्वाधिक ९०.०२ टक्के निकालाची नोंद करत मराठवाड्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तर बीड जिल्हा ८९.७२ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही चांगली कामगिरी करत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल ८९.३१ टक्के लागला असून जिल्ह्याने समाधानकारक कामगिरी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत आपल्या शाळा आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्याचा निकाल ८५.९० टक्के लागला असून हिंगोली जिल्हा ८३.२६ टक्क्यांसह मराठवाड्यात शेवटच्या क्रमांकावर राहिला आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा केला.
यंदाच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे चित्र दिसून आले. अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नियमित अभ्यास, डिजिटल शिक्षणाचा वाढलेला वापर आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे.
दरम्यान, अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील संधींचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*