छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या नियोजनासाठी भाजपच्या विभागीय कार्यालयात रविवारी दिवसभर बैठकांचे सत्र घेण्यात आले.
बुधवारी दुपारी २ वाजता औरंगपुरा येथून तिरंगा यात्रेला सुरुवात होणार असून क्रांती चौक येथे यात्रेचा समारोप होईल. यात्रा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
रविवारी सुटीचा दिवस असूनही विभागीय कार्यालयात सकाळी १०.३० वाजल्यापासून बैठका सुरू झाल्या. रात्री ७ वाजेपर्यंत विविध बैठका घेण्यात आल्या. सकाळी गारखेडा मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर माजी सैनिकांची बैठक घेण्यात आली. सायंकाळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्र बैठकही घेण्यात आली.
यात्रेचा मार्ग, कार्यकर्त्यांचा सहभाग, वाहतूक व्यवस्था, विविध मंडळांची जबाबदारी आणि यात्रेच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे, यासाठीही नियोजन करण्यात येत आहे.
बैठकांना राज्याचे मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड, सभापती अनिल मकरिये, शहराध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश सचिव किरण पाटील, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, माजी महापौर बापू घडमोडे, नांदेडचे संपर्कप्रमुख देशमुख, हर्षवर्धन कराड यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*