छत्रपती संभाजीनगर : शेजारणीसोबत झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेला घरात चोरीचा फटका बसला. शुक्रवारी (७ फेब्रुवारी) या घटनेची माहिती समोर आली असून, महिलेच्या घरातून १२ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना आसेफिया कॉलनीत घडली.
या प्रकरणी तन्वीर जहा शेख सईद (वय ३५, रा. आसेफिया कॉलनी, आक्रम गिरणीजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या आपल्या पती व दोन मुलींसह राहतात आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
मंगळवारी (४ फेब्रुवारी) रात्री साडेसातच्या सुमारास त्या आपल्या दोन्ही मुलींसह घरी होत्या, तर पती कामावर गेले होते. यावेळी घरासमोर राहणाऱ्या नियाजो शेख शेख शमीम हिने तन्वीर जहा यांच्याशी वाद घातला. तिच्या मुलीची चप्पल सापडत नसल्याने तिने तन्वीर जहा यांच्यावर आरोप केला. वाद विकोपाला गेल्यानंतर तन्वीर जहा यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि रात्री साडेआठच्या सुमारास तिथे पोहोचल्या.
तक्रारीनंतर त्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या आणि पुन्हा पोलीस ठाण्यात परत आल्या. नियाजो शेख आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवून रात्री ११ वाजता त्या घरी परतल्या.
शनिवारी (८ फेब्रुवारी) दुपारी तीनच्या सुमारास त्या किराणा आणण्यासाठी कपाटातील ड्रॉवर उघडताच त्यांना धक्काच बसला. कारण त्यामध्ये ठेवलेले १२ हजार रुपये गायब होते. तक्रार देण्यासाठी त्या घर उघडे ठेवून गेल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने रोकड चोरून नेली.
या प्रकरणी तन्वीर जहा यांनी पुन्हा बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत १२ हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार राजकुमार जाधव करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*