छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोड परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तब्बल तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीला गेलेल्या दागिन्यांचे बाजारमूल्य सुमारे चार लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेत जयश्री उन्नीकृष्णन नायर (वय ५५, रा. एन-९, म्हाडा कॉलनी) या फिर्यादी आहेत. १७ जानेवारी रोजी रात्री त्या आपल्या कुटुंबासह बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. रात्री सुमारे १०.४० वाजता जेवण आटोपून त्या पायी टाटा शोरूमच्या दिशेने जात असताना मागून आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रावर झडप घातली. अचानक झालेल्या हिसक्यामुळे जयश्री नायर काही समजण्याआधीच चोरटे वेगाने पसार झाले.
या घटनेनंतर जयश्री नायर यांनी आरडाओरड केली. आसपासच्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधार आणि वेगाचा फायदा घेत चोरटे निसटून गेले. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना विशेष सतर्कता बाळगावी, जड दागिने टाळावेत किंवा झाकून ठेवावेत, असा सल्लाही पोलिसांकडून देण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*