छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया आता वेग घेणार आहे.
जिल्ह्यात एकूण ८७० ग्रामपंचायती असून त्यापैकी ६३७ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. यामध्ये मागील वर्षभरात नव्याने स्थापन झालेल्या १५ ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. या सर्व ठिकाणी नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असल्याने प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २० फेब्रुवारीपर्यंत गुगल अर्थ नकाशांद्वारे प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभाग रचना तयार करतील. तहसीलदारांच्या समितीमार्फत तपासणी होऊन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. एप्रिल महिन्यात प्रारूप प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागवण्यात येतील, तर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
तालुकानिहाय पाहता वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १०५, कन्नडमध्ये ९०, सिल्लोडमध्ये ८४ तर संभाजीनगर तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. ग्रामीण भागातील सत्ताकारणासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून अनेक राजकीय गट तयारीला लागले आहेत. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*