छत्रपती संभाजीनगर : शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणीप्रश्नावर १३ एप्रिलपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धवसेनेचे लबाडांनो पाणी द्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा समारोप १६ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा नेऊन होणार आहे, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. दानवे म्हणाले की, भाजप-शिंदेसेनेने तीन महिन्यांत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही शहरवासीयांना १२ ते १३ दिवसांनी पाणी मिळत आहे. आंदोलनानंतर हे प्रमाण ६ ते ७ दिवसांवर आले आहे. मनपा प्रशासनाने १४० एमएलडी पाण्याचे नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. नवीन पाणीपुरवठा योजना स्वतंत्र असून, जायकवाडी प्रकल्पातील जॅकवेलचे काम केवळ १५ कामगारांकडून सुरू असल्याने ते पूर्ण होण्यासाठी दीड वर्ष लागणार असल्याचे चित्र आहे.
आंदोलनात पक्षाचे शेकडो पदाधिकारी व सामान्य नागरिकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात ९ ते १२ मे दरम्यान ११५ वॉर्डांमध्ये हल्लाबोल पदयात्रा होणार आहे. तसेच १० मे रोजी शहरातील ६० चौकांमध्ये १० चित्ररथ फिरणार असून, त्यात तीन मिनिटांचे भाषण व रॅप साँग सादर होणार आहे. शिवाय ६० उपशहरप्रमुख ५८० बैठकांचे आयोजन करणार आहेत.
या पत्रकार परिषदेला ज्योती ठाकरे, अस्मिता गायकवाड, छाया शिंदे, सुनीता देव, सुकन्या भोसले, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*