छत्रपती संभाजीनगर : शहरात तोतया पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक आणि लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, एमआयटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर एका वृद्ध कामगार ठेकेदाराला भरदिवसा गंडा घालून सुमारे अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
रामाश्रय बालेश्वर प्रसाद (वय ६६, रा. कमळपुरा रोड, भगतसिंग शाळेमागे, रांजणगाव) हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून, ६ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजता ते रांजणगाव येथून बीड बायपासवरील ईरा हॉटेलजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयाकडे दुचाकीने जात होते. एमआयटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. संबंधित दुचाकीवर कोणतीही क्रमांक प्लेट नव्हती.
या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत, “कालच या उड्डाणपुलाखाली खून झाला आहे. तुम्ही असे सोने घालून फिरू शकत नाही. दागिने काढून खिशात ठेवा,” अशी बतावणी केली. पोलिसांवर विश्वास ठेवून प्रसाद यांनी त्यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तसेच प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून दिल्या.
यानंतर भामट्यांनी दागिने कागदात गुंडाळल्याचे नाटक करून एक पुडी त्यांच्या हातात दिली आणि तेथून निघून गेले. संशय आल्याने प्रसाद यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यात नकली अंगठी असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही दुचाकीवरून वेगाने पसार झाले.
या घटनेत सुमारे अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास झाले असून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरिकांनी अशा तोतया पोलिसांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*