छत्रपती संभाजीनगर : शहरात कार चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. दुचाकी चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात; मात्र आता कार चोरीकडे चोरट्यांचा मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे. अवघ्या सहा दिवसांत दुसऱ्यांदा कार चोरीची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायटेक पद्धतीने कार चोरी करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. न्यू श्रेयनगर आणि उस्मानपुरा परिसरातून रात्रीच्या वेळी अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरात सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या दोन कार चोरून नेण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराबाहेर कार पार्क करणाऱ्या वाहनमालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
न्यू श्रेयनगर येथील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर तिवारी यांनी २०२३ साली Tata Harrier ही कार खरेदी केली होती. घरासमोर पार्किंगची सोय नसल्याने ते आपली कार मित्र व नगरसेवक राजू वैद्य यांच्या घरासमोर उभी करत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री कार पार्क करून घरी प्रस्थान केले; मात्र पहाटेपर्यंत कार गायब झाल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये अज्ञात चोरटे कारची काच फोडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहनाची सिस्टीम हॅक करत असल्याचे दिसत आहे. काही मिनिटांतच त्यांनी कार सुरू करून घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. शहरात गस्त वाढवण्यात आली असून संशयितांच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. नागरिकांनी कार सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, अतिरिक्त सुरक्षा लॉक व अँटी-थेफ्ट सिस्टमचा वापर करावा, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*